एक जमवले गेलेले नाते नवरा-बायको म्हणजेच पती-पत्नी.. पूर्वी कधी एकमेकांना पाहिले ही नसते. आता जन्मभर एकमेकांसोबत एकत्र राहणार आधी अनोळखी मग, हळूहळू होत जाणारी ओळख, हळूहळू होत जाणारे स्पर्श मग येणारे रुसवे, फुगवे, हट्ट, भांडण, अबोला.
हळूहळू घट्ट होत जाणारी वीण, मग एकजीव तृप्तता लग्न मुरायला थोडा वेळ लागतो. हळूहळू मूरत जाते, एकमेकांना नीट ओळखले जाते, वृक्ष वाढत जातो, वेल बिलगते, घट्ट फुले-फळे येतात. नाती घट्ट होतात हळूहळू एकमेकांशिवाय करमत नाही. वय वाढत जाते, ओढ वाढत जाते, एकमेकांवर अवलंबून राहणे वाढत जाते, एकमेकांशिवाय चुकल्या चुकल्या सारखे होते, नंतर मनात हळूहळू भीती वाटत राहते..
“ही गेली तर मी कसा जगू “
“हा गेला तर मी कशी जगू “
इतके एकमेकात गुंततात आणि स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व विसरून जातात किती अजब नाते कोण कुठले एक जमवले गेलेले नाते नवरा-बायकोचे.