सकाळी बाहेरगावी असलेल्या मामेभावाचा फोन आला होता. तो सांगत होता त्यांच्या गावात चालु असलेल्या जत्रे विषयी आणि म्हणत होता तु पण ये ना इकडे खुप मज्जा येईल. त्यावेळेस मी बोलुन गेलो “मला काय पंख आहेत का? कधीही उठाव आणि उडत उडत कुठेही पोहोचावं!”
त्याचा फोन ठेवला आणि मना मध्ये विचारचक्र सुरु झाले, खरंच मला पंख असते तर?
सगळ्यांत पहिल्यांदा म्हणजे कुठेही जाण्यासाठी जे आई-बाबांवर अवलंबुन रहावे लागते ते नाहीसे होईल. क्धीहि, कुठेही जावेसे वाटले तरी ते सहज शक्य आहे नाही का? पंख पसरले, आकाशी भरारी घेतली आणि झालो हवेच्या लाटेवर स्वार. रस्त्यावरील वाहतुकीचा, गर्दीचा त्रास नाही, वाहनाची किंवा वाहनचालवण्याच्या परवान्याची आवश्यकता नाही की अपघाताची भीती नाही.
रस्त्यावरील घाण, कचरा, दुर्गंधी, खड्डे हे सगळे पादचाऱ्यांसाठी, हवेत उडणाऱ्याला त्याची काय पर्वा? अवकाशातुन ही धरणी सुंदर, हिरवीगारच भासते. जमीनीवर भासणाऱ्या उत्तंग इमारती आकाशातुन किती छोट्या वाटतील? कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर. ना राज्यांची बंधन ना देश्याच्या सिमा. मनात आलं तर कधी एका देशात तर कधी दुसऱ्या. कित्ती मज्जा!! शब्दशः सांगायचे झाले तर “वसुधैव कुटुंबकम”, हे विश्वची माझे घर.
पंखांमध्ये बळ समावुन, एक उंच भरारी घेता येईल. उंच.. अजुन उंच, त्या निळ्या आकाश्याच्या दिशेने, ढगांच्या मध्ये. धुंद होऊन त्या निळाईमध्ये तरंगत राहीन नाहीतर मावळत्या दिनकराच्या त्या तांबड्या गोळ्याने सोनेरी झालेल्या आसमंतामध्ये गिरक्या घेत राहीन.
वेळे अभावी, अधीक अंतरामुळे जे अनेक जिवाभावाचे मित्र, नातेवाईक यांची भेट होऊ शकत नाही अश्या सगळ्यांना भेटु शकेन. दिवसभर मोकळ्या आकाश्यात झेपावल्यानंतर संध्याकाळी आपल्या घरट्यामध्ये परतुन पंखांचेच उबदार पांघरुण करीन आणि त्यात निजुन जाईन.
बघा.. नुसत्या विचारांनाच पंख फुटले तर कुठे कुठे जाऊन आलो, मग खरंच पंख फुटले तर!!
© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............
Leave a Reply